नाशिक वृत :- नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयात नाशिक लोकसभेत अर्ज माघारीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांची मनधरणी केली जात असल्याचे पाहायला मिळले. नाशिक लोकसभेतून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले विजय करंजकर यांनी माघार घेत महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंना पाठींबा दिला आहे. त्यानंतर सर्वांच्या नजरा नाशिक लोकसभेतून अपक्ष निवडणूक लढवत असणारे शांतिगिरी महाराज हे उमेदवारी अर्ज माघार घेणार का? याकडे लागल्या होत्या. पंरतु, शांतिगिरी महाराज हे उमेदवारी अर्ज माघार न घेता नाशिकमधून अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले आहेत. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराची अडचण वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
यावेळी बोलतांना शांतीगिरी महाराज म्हणाले की, ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. त्यामुळे आम्ही ठाम निर्धार केला आहे की, नाशिक लोकसभेची निवडणूक लढायची आणि जिंकायची. यामुळे नाशिक लोकसभेतून माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जनतेने आम्हाला उभे केले असून जनतेनेच ही निवडणूक लढायची आणि जिंकायची असा निर्धार केला असल्याचे त्यांनी म्हटले.