अंतरवाली सराटीत मध्यरात्री संवाद: जरांगे पाटील शनिवारी भूमिका जाहीर करणार
आपला महाराष्ट्र वृत्त , अंबड :- आगामी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार द्यायचे की नाही, हे समाजाशी बोलून ३० तारखेला निर्णय घेण्याची भूमिका मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मांडली आहे. याच पार्श्वभूमीवर मविआसोबत जागा वाटप अंतिम होत नसलेले वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी मध्यरात्री अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेवून जवळपास दीड तास चर्चा केली. लोकसभा निवडणुकीसह इतर बाबींवर ही चर्चा झाली.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २४ मार्च रोजी समाजाची राज्यव्यापी बैठक घेवून चर्चा केली होती. गावागावातून उमेदवार देण्याऐवजी प्रत्येक मतदारसंघातून एक अपक्ष उमेदवार द्यावा. त्यातही प्रत्येक जाती-धर्माचा उमेदवार द्यावा, असा सल्ला जरांगे पाटील यांनी दिला होता.
सोबतच गावागावात समाजाची बैठक घेवून समाजाचा होकार किंवा
नकार टक्केवारीत कळवा अपक्ष उमेदवार देण्याबाबत ३० तारखेला निर्णय घेवू असे जरांगे पाटील म्हणाले होते.
मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला दोन दिवस होत नाहीत तोच वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी रात्री ११:४५ वाजण्याच्या सुमारास अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेवून चर्चा केली. जवळपास दीड तास चाललेल्या या चर्चेत मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा, लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली.
सकारात्मक चर्चा अॅड. आंबेडकर :
![](https://aplamaharashtra.com/wp-content/uploads/2024/03/WhatsApp-Image-2024-03-27-at-02.58.09.jpeg)
लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. लोकसभा निवडणुकीसह पुढील वाटचाल कशी करायची? यासह इतर विषयांवर चर्चा झाली. संयुक्त निवडणूक लढायची का? यावर मात्र वेळ येईल त्यावेळी सांगू आम्ही भेटलो म्हणजे सकारात्मक चर्चा झाली, असे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी मध्यरात्री अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली.
तर ताकदीने उतरु : जरांगे पाटील
माझा राजकारणावर विश्वास नाही. समाजाने नाही म्हटले तर नाही आणि समाज हो म्हटला तर इतक्या ताकदीने उतरणार की, त्यांनी मला आंदोलनात जितके हलक्यात घेतले होते तसे राजकारणात घेऊ नये.
वंचितकडून प्रस्ताव आला असला तरी सर्व सूत्रे समाजाच्या हाती दिले आहेत. गावागावातील बैठकीचे निर्णय कळतील, समाजाच्या म्हणण्या- नुसार ३० तारखेला चित्रच स्पष्ट करू.
गावा-गावातून अपक्ष उमेदवार देण्याबाबत निर्णय घेवू, माझा जन चळव- ळीवर विश्वास आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.