त्रिंबकेश्वर:- संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या जन्मास साडेसातशे (७५०) वर्ष पूर्ण झाली या जन्म महोत्सवी वर्षांची सांगता आणि ७५१व्या जन्म महोत्सवी वर्षात पदार्पण या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ समाधी संस्थानतर्फे राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन मंगळवार दिनांक १९ ते २६ मार्च या कालावधीत त्रंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ संस्थांनच्या प्रांगणात होणार आहे.या सप्ताहाची सुरुवात मंगळवार दि.१९ रोजी सकाळी सात वाजता महाराष्ट्र स्तरावरील ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, गुनिजन व वारकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत विना पूजनाने व ध्वजारोहणाने होणार असून याच वेळी विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ प्रवेश महाद्वाराचे पूजन, तसेच निवृत्तीनाथ संस्थांनच्या वतीने अधिकृतरित्या तयार झालेल्या संत निवृत्तीनाथांच्या अभंगगाथेचे प्रकाशन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते याच वेळी होणार आहे.या सप्ताहाचे वैशिष्ट्य असे की, नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून ७५१ वारकरी निवृत्तीनाथ महाराजांच्या अभंगगाथेचे पारायण करणार आहेत. दररोजच्या कीर्तनासाठी ७५१ टाळकरी, हरिपाठ गायनासाठी ७५१ वारकरी रोज सेवा देणार आहेत. या सप्ताहामध्ये दोन सत्रात कीर्तनसेवा पार पाडणार असून सकाळी व रात्री अशा दोन्ही वेळी कीर्तन होणार आहे. ह भ प बंडातात्या कराडकर, रामेश्वर शास्त्री, गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत, न्यायाचार्य ह भ प नामदेवशास्त्री सानप आदी महाराष्ट्र स्तरावरील नामांकित कीर्तनकारांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. ह .भ .प .चंद्रशेखर महाराज देगलूरकर पंढरपूर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे. किर्तनसेवा पार पडल्यानंतर उपस्थित वारकऱ्यांची सकाळच्या नाश्त्याची व महाप्रसादाची सोय संस्थांनच्या जवळच असलेल्या कैलास मठातील प्रांगणात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील निफाड चांदवड इगतपुरी त्रंबकेश्वर हरसुल दिंडोरी इत्यादी तालुक्यातील वारकरी आपापल्या पद्धतीने सप्ताहामध्ये श्रमदान करणार असून या तालुक्यातीलच वारकरी भाविकांनी अन्नदानासाठी मदत केलेली आहे. सप्ताहातील सातही दिवस जिल्ह्यातील एकेक तालुका असे करून सकाळ व दुपार सत्रातील भोजनव्यवस्था व इतर श्रमदानाची जबाबदारी तालुकानिहाय विभागून देण्यात आलेली आहे. सप्ताहासाठी भव्य दिव्य स्वरूपाचा सभामंडप उभारलेला असून विश्वगुरू निवृत्तीनाथ प्रवेशद्वार असे नाव सभामंडपाला देण्यात आले आहे. या सभा मंडपाच्या प्रवेशद्वारावरच ७५१ भाविकांवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. सप्ताह नियोजितपणाने पार पाडावा यासाठी भोजन समिती ,स्वयंसेवक समिती नाश्ता व महाप्रसाद वाटप समिती, इत्यादी श्रमदान करणाऱ्या वेगवेगळ्या समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. या भव्य दिव्य सप्ताहासाठी जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील वारकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन निवृत्तीनाथ संस्थांनच्या वतीने अध्यक्ष निलेश गाढवे, ऍड सोमनाथ घोटेकर, विश्वस्त तथा प्रसिद्धीप्रमुख प्रा. अमर ठोंबरे नारायण मुठाल, जयंत महाराज गोसावी, राहुल महाराज साळुंखे, ह भ प कांचनताई जगताप, श्रीपाद कुलकर्णी, माधवदास राठी, नवनाथ गांगुर्डे आदींनी केले आहे
![](https://aplamaharashtra.com/wp-content/uploads/2024/03/IMG-20240317-WA0046-724x1024.jpg)