नाशिक :- सिंहस्थाच्या नियोजनासाठी स्थापन करण्यात आलेल्या कमिटीत साधुसंतांना स्थान नसणे ही अतिशय खेदजनक बाब आहे, या समितीत प्रशासकीय अधिकार्यांबरोबर साधुसंतांनाही स्थान देण्यात यावे अशी आमची मागणी असून यासंबंधी शासन स्तरावर बोलणी करण्यात येईल अशी माहिती अखिल भारतीय सनातन परिषदेचे महाराष्ट्राचे प्रभारी तथा पीठाधीश्वर, श्रीराम शक्तीपीठ संस्थान, राष्ट्रसंत अनंत विभुषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती जी महाराज यांनी दिली.
अखिल भारतीय सनातन परिषदेतर्फे 10 ते 19 फेब्रुवारी 2024 दरम्यान नवी दिल्ली येथील रामलीला मैदानावर अश्वमेध राष्ट्र निर्माण महायज्ञ (108 कुण्डीय) संपन्न होणार आहे, याची माहिती देण्यासाठी स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती जी महाराज यांनी त्र्यंबकरोडवरील बेजे येथील आश्रमात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज पुढे म्हणाले की, अश्वगतीने राष्ट्र निर्माण सुरु व्हावे तसेच सर्व भारतीय सनातन धर्मासोबत जोडले जावे या उद्देशाने अखिल भारतीय सनातन परिषदेतर्फे अखिल पंचायती अखाडा श्री निरंजनी, अखिल भारतीय अखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहन्त रविन्द्रपुरी यांच्या अध्यक्षतेखाली अश्वमेध राष्ट्र निर्माण महायज्ञ होणार आहे.
हा महायज्ञ विश्वाच्या कल्याणासाठी होणार असून यात सनातन धर्मातील सर्व जाती धर्माचे हजारो भाविक आहुती देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.अखिल भारतीय सनातन परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री पुरुषोत्तम शर्मा यांनी सांगितले की, महायज्ञात गोमातेला राष्ट्रीय पशु घोषित करण्यात यावे तसेच सनातन आयोगाची स्थापना करण्यात यावी या मागण्यांचा प्रस्ताव पारित करण्यात येणार आहे. महायज्ञात श्रीराम कथा, श्रीमदभागवत कथा तसेच धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. महायज्ञात 13 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातर्फे एक दिवसीय हनुमान चालिसा कार्यक्रम देखील संपन्न होणार आहे